मारेगाव तालुक्यात वीज संकट – अपुऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांचे पिके सुकतायत, जनावरांना पाणी नाही; प्रशासन गप्प आणि बधीर!
मारेगाव (प्रतिनिधी) – मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेती करणे म्हणजे आता एक त्रासदायक स्वप्न ठरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावांत अपुरा आणि विस्कळीत वीजपुरवठा सुरू आहे, ज्यामुळे शेतातील पिके सुकत आहेत आणि उत्पादनावर थेट परिणाम होत आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, शेतातील जनावरांनाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही. या साऱ्या समस्यांवर प्रशासनाकडून मूकसंमती मिळत असल्यासारखं चित्र आहे.
कुंभा व आजूबाजूच्या गावांमध्ये ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. वीजपुरवठा अचानक जातो, ट्रान्सफॉर्मर बंद पडतात, फ्यूज उडतात, खांब मोडतात – आणि या साऱ्या तक्रारी नोंदवल्यानंतरही कोणतीही कार्यवाही होत नाही. कारण अगदी स्पष्ट आहे – संपूर्ण विभागात केवळ एकच लाइनमन कार्यरत आहे! एवढ्या मोठ्या क्षेत्राचा भार एका व्यक्तीवर टाकल्यामुळे दुरुस्ती वेळेत होत नाही, आणि त्याचा संपूर्ण फटका शेतकऱ्यांवरच बसतो.
शेतकऱ्यांच्या मागण्या ठाम आणि रास्त:
• शेतीसाठी नियमित, अखंड आणि वेळेवर वीजपुरवठा मिळावा.
• लाइनमनची संख्या किमान ४ ते ५ पर्यंत वाढवावी, जेणेकरून तातडीची सेवा मिळू शकेल.
• तांत्रिक अडचणींवर त्वरीत उपाय करणारे स्वतंत्र दुरुस्ती पथक स्थापन करावे.
शेतकरी वेळेवर वीजबिलं भरतो, पण वेळेवर सेवा मिळत नाही, हा दुजाभाव सहन केला जाणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
महावितरण विभागाने जर तातडीने हालचाल केली नाही, तर ग्रामीण भागात संताप उसळेल आणि तीव्र आंदोलन होणार, हे निश्चित असल्याचं मत आता सर्वत्र व्यक्त केलं जात आहे. यावेळी उपस्थित रोहन आदेवार, सचिन मेश्राम, आनंद नक्षणे, रवींद्र घुमे, सुनिल उताणे, पंकज नेहारे, शेषराज मडावी, विवेक तोडासे उपस्थित होते.