धुव्वाधार पावसाने घाटंजी तालुक्यात समाधानाचे वातावरण...
वाघाडी नदीसह नाल्यांना पूर -
पारवा मार्गांवरील वाहतूक ठप्प
इंदिरानगर सह काही भागातील घरात पाणी
घाटंजी (तालुका प्रतिनिधी )
मे महिन्यातच सुरुवात झालेल्या पावसामुळे यावर्षी चांगला पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी जवळपास पेरणी करून टाकली. यातच पावसाने हुलकवानी दिल्याने बियाणे उगवलेच नाही.पेरणीची वेळ निघून गेल्यावर पिक येणार नाही या भितीने दुबार पेरणी करून पावसाच्या प्रतीक्षेत असतांनाच गुरुवारच्या मध्यरात्री पासून पावसास सुरुवात होऊन रात्रभर धो - धो धुव्वाधार बरसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद संचारून समाधान व्यक्त केले जात होते. एवढा पाऊस पडला की, या पावसाने वाघाडी नदी व नाल्याना पूर येऊन वाहतूक ठप्प झाली होती.
. सुरुवातीला हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकरी बांधवानी पेरणी केली. मात्र जिकडे तिकडे पाऊस पडतांना दिसत असले तरी विदर्भात पावसाने दडी मारली होती. यामध्ये घाटंजी तालुक्यातील शेतकरी चिंतेत वावरतांनाचे चित्र निर्माण झाले होते. अश्यातच पेरणीची वेळ निघून गेल्यावर पिक येणार नाही. म्हणून दुबार पेरणी केली आणि आकाश्यात नजरा लावून बसला होता. एवढ्यात गुरुवारच्या मध्यरात्री जोरदार पाऊसास सुरवात होऊन रात्रीतून जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या पावसामुळे घाटंजी शहरातून वाहणाऱ्या वाघाडी नदीसह तालुक्यातील बहुतांश्य नालयांना पूर आले होते. यात पारवा मार्गांवरील येरंडगाव जवळील नाल्याला पूर येऊन पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने पारवा, अदिलाबाद,किनवट मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती तर आमडी, पंगडी, किन्ही, ससानी येथिल नाल्याना पूर आल्याने काही काल रस्ते बंद होते. घाटी स्थित इंदिरानगर व शहरातील काही भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने चांगलीच तारांबळ उडाली होती. काही भागात नालीचे पाणी थांबल्याने ते पाणी अक्षरशः घरात घुसले यात चांगलेच नुकसान झाल्याचे समजते.तालुक्यातील पुराची परिस्थिती पाहून प्रशासनाकडून खबरदारीची सुचना देण्यात आल्या होत्या याचे जनतेने काटेकोर पालन केल्याने वृत्त लिहेपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे ऐकण्यात आले नाही. हा पाऊस शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी वरदान ठरल्याचे बोलले जात असून सकाळ नंतर पावसाने उसंत घेतल्याचे चित्र होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी च्या दृष्टीने प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.