अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस ओलाचिंब तुरीचेही झाले नुकसान

अवकाळी पावसामुळे शेतातील कापूस  ओलाचिंब तुरीचेही झाले नुकसान


राळेगाव तालुका प्रतिनिधी  


राळेगाव तालुक्यात दोन दिवसापासून विजेच्या कडकडासह आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील वेचणीला आलेला कापूस ओला चिंब झाला तर फुलगळ असलेल्या तुरीचेही अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
 यावर्षी खरिपाच्या सुरुवातिलाच बळीराजाचे हिरवं स्वप्न जुलै महिन्यात अतिवृष्टीने उद्ध्वस्त केले त्यातूनही उरल्या सुरल्या पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त असतांना सोयाबीन पिकांवर आलेल्या ऐलो मॅजिक रोगाने सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नसल्याने सोयाबीनचा उतारा दोन तीन क्विंटलच आल्याने लावलेला खर्चही निघाला नाही. एवढेच नाही तर कपाशी पिकावरही लाल्या रोग आल्याने कापूसाची दुसऱ्या वेचणीतच उलंगवाडी होणार असल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. 
तालुक्यातील शेतकऱ्यांना खरिपाच्या उत्पन्नाने साथ दिली नसली तरी रब्बीत तरी साथ देईल  या आशेने शेतकऱ्यांनी आपले दुःख बाजूला सारून  रब्बीची पेरणी केली.
 रब्बीला जरी अवकाळी चा फायदा झाला असला तरी कपाशी तुरीचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला आहे. या कापसाच्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड होईल व तूर पिकावर 
वर्षभऱ्याचा खर्च तरी भागेल असे असतानाच पावसाने दोन दिवसापासून हजेरी लावल्याने शेतात असलेले पांढरे सोने ओले चिंब झाले तर तूर पीक फुलगळ असताना पूर्णतः फुलगळ झाली असल्याने शेतकऱ्यांचे वर्षभऱ्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे .

  सध्या कापूस वेचणीचे लगबग सुरू असताना मजुरा अभावी अनेकांच्या शेतात कापूस फुठून असून वेचण्यास विलंब झाला आहे आता या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे  पाऊस असा सुरू राहिल्यास सोयाबीन नंतर आता कापूसापाठोपाठ तुरीचा ही घास  हिरावून घेण्याची शक्यता आहे.